Wednesday, 3 May 2023

ती परत येते तेव्हा...


शांता नाव तिचं. सावळी पण नाकी डोळी खूप छान. चार चौघात उठुन दिसेल असा चेहरा पण नावाप्रमाणे स्वभाव नाही. खूप संशयी आणि भांडखोर स्वभाव. उगाच छोट्या छोट्या कारणांवरून भांडण करणारी. गुणाजी अगदी साधा .नवरा शांताचा. शांता भांडायला लागली की हा गप्प. शांता सगळा राग नवऱ्यावर काढायची. सासू सुनेची भांडणं तर रोजचीच आणि दोघांमध्ये अडकीत्यातल्या सुपारी सारखा गुणाजी. खूप राग यायचा त्याला बायकोचा पण शांत बसायला लागायचं. कारण ह्या महामाये सोबत कोण भांडण करणार 

दिवसामागून दिवस जात होते. आणि एके दिवशी रात्री शांताच आणि तिच्या सासुच कडाक्याचे भांडण झालं कशावरून तरी. त्यात गुणाजी दारू प्यायलेला त्यादिवशी. दारूच्या नशेत बायकोला नको नको ते बोलला . हिच्या पण काय मनात आलं हिने रागाच्या भरात रॉकेलची बाटली  अंगावर ओतून घेतली आणि पेटवून घेतल स्वतःला. काळा ठिककर देह  राख रांगोळी झाली शांताची. गुणाजी ने तिला वाचवायचा खूप प्रयत्न केला पण नाही वाचवू शकला तो शांताला. शांता आता कायमची शांत झाली होती.

दाहाव्याला पिंडला कावळा शिवला नाही. खूप विनवण्या केल्या खूप आश्वासन दिली गुणाजीने. तुझ्या मुलांकडे नीट लक्ष देईन . शांता काळजी करू नकोस एवढ सगळं करून पण काही उपयोग नाही. मग ब्राम्हणाने दर्भाचा (गवताचा) कावळा बनवला आणि पिंडदान उरकून घेतलं. इकडे गुणजीचा जीव काही  थाऱ्यावर न्हवता  त्याला वाटत होते  शांताच्या बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिल्या तिन वर्षांचा विकास आणि एक वर्षाच्या सुमनला मागे ठेवून शांता काशी काय गेली.अस कस काय केलं तिने. जिवंत असताना देखील त्रास दिला आणि आता तिच्या आठवणीने देखील त्रास होतोय स्वतःचा मनाशी बोलत गुणाजी चालत होता.

सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाले. दिवसामागून दिवस जात होते पण अचानक एक दिवस रात्री पौर्णिमा होती त्या दिवशीं. गुणजीची आई परसात गेली होती. तिकडे कोणीतरी असल्या सारखा भास झाला तिला ती अजून थोडी पुढे गेली. तीच देहयष्टी. मोकळे केस सोडलेले. शांताच होती ती. पांढराफटक चेहरा त्यात पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश त्यात ती अजून पांढरी दिसत होती.शांतेच्या सासूने किंकाळी फोडली. त्या आवाजाने गुणजीची झोप उडाली तो बाहेर आला त्याने बघितल तर आई खाली जमिनीवर पडलेली दिसली. शुद्ध हरपलेली म्हातारीची. थोड्यावेळाने शुद्धीवर येताच तिने गुणाजीला बघितलेल्या गोष्टीं बदद्दल परत आलेल्या शांतें बद्धल सांगितलं. गुणाजी म्हातारीला समजावून सांगत होता भास झाला असेल तुला आई.घाबरू नकोस पण मनातून तो प्रचंड घाबरलेला होता त्याला पिंडदानाचा दिवस आठवला आणि तो गवताचा कावळा. त्यानं स्वतःलाच विचारले ती परत आली असेल का. शेवटी माझंच खर झालं .वाटलेलंच मला ती परत येईल. इतक्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तिच्या.विचार करत करत गुणाजी झोपी गेला. त्या दिवसा नंतर मग गावातल्या बरेच जणांना तिने घाबरवून सोडलं. बरेच जणांना ती कुठे कुठे दिसली होती.


आजचा दिवस माझा होता. दिवस म्हणण्या पेक्षा रात्र. अशीच एक रात्र त्यावेळी मी गावी होतो मामे भावाकडे. गावच्या वाडी मध्ये  म्हणजे खालच्या वाडी मध्ये एका मुलाच्या लग्नाच्या हळदीचा समारंभ होता. कोकणात बरेचदा हळदीला उशीर होत असे. हळदी समारंभाला माझी मामी सुद्धा गेली होती तिला परतायला खूप उशीर झाला रात्रीचे 12 वाजून गेले असतील.


आम्ही सगळे गाढ झोपलो होतो मी आणि माझा मामे भाऊ वर खाटेवर, आणि माझा सक्खा धाकटा भाऊ खाली झोपला होता त्याच्या बाजूला माझ्या दोन मामे बहीण झोपल्या होत्या आणि सोबत एक बाई त्या पेइंग गेस्ट राहत होत्या. त्या गावच्या शाळेत शिक्षिका होत्या.मामी हळदी समारंभ उरकून परत आली .मामा बाहेर अंगणात झोपले होते. मामी येणार म्हणून आतून दाराला कडी लावली न्हवती 


मामीने दरवाजा उघडला आणि तिने माझ्या बहिणीला आवाज दिला शालू माझ्या बहिणीच नाव शालिनी तिला आवाज दिला शालू झोपलीस काय. आवाजामुळे तिघीही उठल्या पण जोरात किंचाळत. मी आणि माझा भाऊ खाटेवरून ताडकन उठलो मी लाईट चालू केली बघतो तर समोर मामी उभी. पण माझ्या बहिणी आणि ती पेइंग गेस्ट आम्हाला दिसल्या नाहीत  नंतर कळले की त्या खाटेच्या खाली जाऊन लपल्या होत्या.माझा धाकटा भाऊ मात्र किंचाळीच्या आवाजाने घाबरून तोंडावर पांघरूण घेऊन झोपला होता. मला आणि मामे भावाला आणि माझ्या मामाला काहीच कळलं नाही की काय झालंय आम्ही माझ्या बहिणींना आणि त्या शिक्षक बाई ना खाटे बाहेर बोलावलं थरथर कापत होत्या त्या .मी माझ्या धाकट्या भावाला उठवलं तो ही घाबरत उठला त्यालाही नेमकं काय झालं माहीत नव्हत. थोडयावेळाने बहिणींना आणि त्या मॅडम ना पाणी पाजल मग त्यांना विचारलं काय झालं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मी तर घाबरूनच गेलो. मामीने जेव्हा दरवाजा उघडून आवाज दिला तेव्हा या तिघी उठल्या पण त्यांना मामी दिसलीच नाही त्या तिघीना ती दिसली शांता. तीच्या सासूला दिसली तशीच कुंकू लावलेली, केस मोकळे सोडलेली पांढरीफट शांता .भयानक अशी आणि तिला बघूनच तिघी खाटेखाली लपल्या. 


शिक्षक बाईंनी सगळ्यांना साईबाबांचा अंगारा लावला. मामी ला पण कशी दिसली नाही ती सगळ्यांना पडलेला हा प्रश्न . शिक्षक बाई सांगू लागल्या की हळदीच्या अंगाला भुतं येतात .शांता देखील हळदीच्या वासाने मामीच्या मागून चालत आली असेल.आणि दरवाजा उघडला तेव्हा मामीसमोर उभी राहिली. लाईट लावताच ती नाहीशी झाली 


मामीला पण काहीच कळाले नाही. दुसऱ्या दिवशी मामी तिच्या एका चुलत भावाकडे गेली तो भगत म्हणजे ( मांत्रिक ) होता त्याने पण तिला संगीतल की तीच आली होती त्यानं मग विभूति वैगरे देऊन मामीला सांगितलं काही काळजी करू नको मी बघतो काय ते. 


तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मी तिला बघितलं नाही किंवा माझ्या भावाने देखील नाही आणि प्रत्यक्षात जिच्या मागून ती आली त्या माझ्या मामीने पण नाही. पण त्या तिघींच काय. एकीला भास होऊ शकतो पण तिघीना पण. त्या तिघीनी पण सांगितलं त्यांनी तिलाच बघितलं शांतेला.

आजही शांता आपल्या अस्तित्वाची ओळख करून देते. कधी मिळेल मुक्ती तिला माहीत नाही....

हे सगळं अकल्पित आहे पण जर जगात चांगल्या गोष्टी असतील तर त्या विरुध्द वाईट गोष्टीं पण असतील ना. 

।। शुभम भवतु ।।

प्रदीप मोहिते

Thursday, 3 May 2018

आयुष्य सुंदर आहे. अगदी मजेत जगावे. पूर्वी संत आणि कीर्तनकार समाजप्रबोधन करायचे. आता लाईफ ट्रान्सफॉर्मॅशन आणि लाईफ मॅनेजमेंट सारखे आधुनिक कीर्तनकार निर्माण झालेत. लाखो रुपयांची प्रवेश फी भरून आपण आयुष्य कस जगायचे हे शिकतो आहे. यात खरतर वावगं काहीच नाही चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं करून जर काही व्यवस्थित झालं नाही तर मग काय ?? 

Friday, 13 April 2018

अतृप्त आत्मे आणि ती..

आतृप्त आत्मे बघितलेत का तुम्ही. अहो ही भूत नाहीत. हे आहेत अतृप्त आत्मे पीशाच्च योनीतील नाही. तर हे आहेत मानव योनीतील अतृप्त आत्मे. 

भुतं मंदिरात जात नाहीत घाबरतात ती देवाला. पण ही भूत मंदिरात जातात खुशाल यांना भीती वाटत नाही देवाची.कारण याना माहीत आहे हा देव काय करणार आमचे वाकडे. हा फक्त बघत बसणार.


एक छोटी परी खूप सुंदर निरागस तिच्या वर ह्या भुतांची नजर पडली. पकडला तिला एकटीला बघून आणि मंदिरात आणून तीचे पंख छाटले. भुतांची जत्रा जमा झाली तिकडे. एक एकाने ओरबाडून काढलं तिला. रक्तबंबाळ केल तिचं शरीर आणि शेवटी घातला एक दगड परिच्या डोक्यात. एक बळी दिला देवाला. परी आता निपचित पडली.


आता फक्त उरले मंदिरात ते अतृप्त आत्मे आणि एक पवित्र आत्मा त्या परीचा. बिचारीला कळलंच नाही तिचं असा का झालं.पण आता ती आनंदात असेल कारण ह्या असंवेदनशील जगात ती पुन्हा नसेल


प्रदीप मोहिते

Friday, 6 April 2018

भीती लागे जीवा..

एखाद्या गोष्टीची भीती वाटणे हे स्वाभाविक आहे. लहानपणापासून आपल्याला भीती दाखवली जाते. तू जर जेवला नाहीस ना तर बागुल बुवा येईल, देवबाप्पा कांन कापेल, मस्ती करतोस थांब आता पोलिसाना सांगते, उंचावर चढू नकोस, अशा बऱ्याच गोष्टींची भीती. 


पण ही भीती आपल्या चांगल्या साठी दाखवली जायची . म्हणजे हया भीती मुळेच आपण चांगल आणि  वाईट काय हे समजून घेऊ शकतो. लहान मुलांना भीती दाखवल्या मुळे त्यांनाही समजत की कुठल्या वस्तूला हात लावला पाहिजे आणि कुठल्या नको. आणि बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टीचा फरक कळतो.

आपण मोठे होतो तस तसे भीती बदलत जाते उदा. विदयार्थ्यांना अभ्यासाची, परीक्षेची भीती, अजून थोडे मोठे झाल्यावर तर मग विचारू नका अगदी ऑफिस ला वेळेवर पोचण्यापासून, टार्गेट पूर्ण करणे, कामाचा ताण, स्वतःला सिद्ध करणे या सगळ्या गोष्टींची भीती धंदा व्यवसाय यातील अपयश आणि या सारख्या बऱ्याच गोष्टीं.


 स्पर्धा ताणतणाव दुरावलेले नातेसंबंध या मुळे आलेले डिप्रेशन या सगळ्यांचा मग शरीरावर आणि त्याच बरोबर मनावर होणारा वाईट परिणाम.आणि मग सुरु होतो भीतीचा खेळ एक अनामिक भीती आता आपल्या मनात घर करू लागते.


 आणि मग कधीतरी त्या भीतीच जोरदार आक्रमण आपल्या मनावर. हृदयाचे ठोके वाढतात छातीची धडधड वाढते. रक्तदाब वाढतो. ह्या सर्व गोष्टींना आपण मेडिकल च्या किंवा डॉक्टरांच्या भाषेत पॅनिक अटॅक असे म्हणतो.पॅनिक अटॅक येतो तेव्हा अस वाटत संपला आता सगळं आता माझा शेवट होणार मी आता जगणार नाही मला काहीतरी होईल असं वाटत. शरीरातील ऑक्सिजनची लेवल कमी होते त्यामुळे मग श्वास घ्यायलाही त्रास होतो जीव प्रचंड घाबरा घुबरा होतो हा अटॅक अगदी काही मिनटांपासून साधारण काही व्यक्तींमध्ये तासभर याची लक्षणे  जाणवतात अस का झाला हे देखील समजत नाही आणि आता पुढं काय करावे लागेल हे देखील समजत नाही.जे या सगळ्यातून गेलेत त्यांना मी काय म्हणतोय ते लगेच लक्षात येईल.

आता यावर उपाय काय. काय करावं म्हणजे ह्यातून सुटका होईल. कोण आपल्या रोजच्या डॉक्टर कडे जातो औषध घेतो थोडे दिवस बरं वाटत. पण काही दिवसांनी परत काहीस तसच वाटायला लागतं, काही जणांना वाटत मला हार्ट चा काही प्रॉब्लेम आहे म्हणून ते हार्ट चेकअप करतात अगदी E.C.G काढण्या पासून सर्व काही पण सगळे रिपोर्ट नॉर्मल. कोण कोणाला तर साधा दरवाजा जोरात बंद झाल्याच्या आवाजाने सुद्धा घाबरायला होत. नुसत्या मोबाईलच्या रिगटोन मूळे सुद्धा.


या वर उपाय म्हणजे समुपदेशन  आणि मनोविकारतज्ञ यांचा सल्ला घेणे. काहींना अस वाटत की मी वेडा आहे का मी का जाउ मनोविकारतज्ञाकडे पण जर का हे थांबवायचं असेल तर मग आपल्याला डॉक्टर कडे जावंच लागेल किंवा मग संमोहनतज्ञाची मदत घ्यावी लागेल. कारण आलेला पॅनिक अटॅक आत कुठेतरी दडून बसतो आणि कधीतरी परत डोकं वर काढतो. कधी कधी सगळं नॉर्मल असत पण अचानक परत तस वाटत. नुसत्या त्या विचाराने देखील घाबरायला होतं. 


डॉक्टरांच्या औषधा मुळे खूप फरक पडतो. प्राणायाम, ध्यानधारणा नामस्मरण करण्या मुळे देखील अराम मिळतो. स्वतःला म्हणजे स्वतःच्या मनाला सूचना देणे म्हणजे समजा असा काही झालं की स्वतःला समजवायच की घाबरू नकोस शांत राहा मला काही होत नाही हे तात्पुरते आहे स्वतःला बर वाटतंय अस मनाला सांगायचं. 


ताण हलका करण्यासाठी मन स्थीर राहण्यासाठी शांत music ऐकायच. आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये चांगला बदल आणायचा. शक्यतो व्यसनांपासून दूर राहायच. आहारामध्ये योग्य तो बदल करायचा, जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा . मग भीतीच काहीच कारण नाही. 


भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस  वाट तुझी. तुकारामांचा हा अभंग. तुकारामांना विठ्ठल भक्ती आणि पांढरीला जायची आस लागली आहे. 


आपण निदान थोडावेळ तरी परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे आणि परमेश्वराचे आभार व्यक्त केले पाहिजेत. त्यातून एक आत्मिक समाधान मिळते. 

।। शुभम भवतु ।।

प्रदीप मोहिते



 



Friday, 9 March 2018

शहाणपण देगा देवा

तुम्ही म्हणाल हा काय विषय आहे शहाणपण देगा देवा.

शहाणपण म्हणजे काय .माणूस प्रगल्भ होतो ,समंजस होतो , हुशार होतो, इंग्लिश मध्ये तो Matured होतो म्हणजे नेमकं काय होत. ज्याला बर काय आणि वाईट काय हे समजत तो समंजस अस आपण म्हणू. खरच आपण प्रगल्भ झालो आपण समंजस झालो. किंवा आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मी समंजस आहे . पण मी जेव्हा सोशल मीडिया बघतो टीव्ही वरील बातम्या बघतो तेव्हा मला जाणवत की आपण किती संकुचित वृत्तीचे आहोत. 

श्रीदेवी गेल्या नंतर बरेच जणांनी तिच्या बद्दल लिहिलं बरेच जण तिच्या बद्दल उलट सुलट बोलले. माणसाचा स्वभाव वेगवेगळा त्या नुसार तो बोलणारच. पण काही जणांनी तिला दारू पिणारी.काहींना तिला तिरंग्यामष्ये लपेटून नेलेल रुचल नाही.

सगळ्यात मोठा कहर म्हणजे काहींनी तर आपले जवान रोज शाहिद होतात त्यांच्या समोर ही कोण. ही मरण पावली कश्या मुळे तर दारू पिऊन ती पडली आणि तिचा मृत्यू झाला. काय म्हणावं याला. 

श्रीदेवी वाईन प्यायची. मी दारू ला प्रोत्साहन देतोय असा नाही पण आपल्या जवानांना देखील काही प्रमाणात रम, वाईन प्यायची मुभा आहे त्यांना ती पुरवली देखिल जाते काही प्रमाणात ती आरोग्यासाठी चांगलीही असते पण सरसकट एखाद्या व्यक्तीला नशेबाज म्हणणं पण अयोग्य. एखाद्या व्यक्तीला खासगी आयुष्य असत. 

आम्हाला आमच्या सैनिकांना बद्दल नितांत आदर आहे ते आहेत म्हणून आपण आहोत. जवान सीमेवर आपल रक्षण करत आहेत त्यांच्या कार्याला सलाम पण म्हणून काय तुम्ही सिनेनट आणि सैनिक अशी तुलना करणार. सिनेस्टार त्यांच्या जागेवर आहेत आपले जवान त्यांचा जागेवर आहेत.


बरेच वेळा सोशल मीडिया फेसबुक वर एखादा मोठ्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा फोटो दुसरीकडे सैनिकांचा फोटो. आणि एक टॅग लाईन ह्या पैकी तुमचा रिअल हिरो कोण . 

मग ह्या मूर्खां सारख्या पोस्ट वर लाईक किंवा कंमेंट्स. ज्यांना खरच काही उद्योगधंदे नाही आहेत किंवा जे खरच अजून प्रगल्भ झाले नाहीत अशी माणसं अश्या पोस्ट करत असतात आणि आपण रिप्लाय करत असतो . खरच ह्यांना देश प्रेम माहीत असेल का किंवा जवानांच्या बद्धल आस्था असेल का. मी तर म्हणतो अश्या पोस्ट करणाऱ्यांनी स्वतः काही देश कींवा समाजउपयोगी काम केली असतील का. अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना देश प्रेम नाही अस ह्या लोकांना वाटतही असेल. काही जणांचे अपवाद सोडले तर ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वताच्या देशाबद्दल नितांत आदर आहे प्रेम आहे. पण काही अतीशहाणी माणसं आपल देशप्रेम कस उफाळून येतंय हे दाखवण्याचा बाष्कळ प्रयत्न करतात. 

समजा तुम्हाला एका बंद रूम मध्ये ठेवल तुम्हाला करमणुकीचे साधन म्हणजे टीव्ही किंवा लॅपटॉप,इंटरनेट,मोबाइल अस काहीच दिल नाही तर तुमचा दिवस कसा जाईल. तुम्ही पूर्णपणे कंटाळून जाल. याचा अर्थ असा की माणसाला विरंगुळा पाहिजे करमणूक पाहिजे नाहीतर जीवन उदास होईल . म्हणूनच तर आपण चित्रपट, नाटक, संगीत ह्या मध्यमाकडे वळतो. 

ही करमणूक कोण करतो तर आपले आवडते नट . काराण म्हणजे त्यांचा सहज सुंदर अभिनय म्हणजे थोडक्यात ते तुम्हाला आनंद देतात. तुम्ही त्या चित्रपटातील कथेशी आणि त्यातील पात्रांशी एकरूप होता. तुमच्या मनात त्यांच्या बद्दल एक वेगळी जागा निर्माण होते. 

अभिनय करणे हे कुठल्याही ऐऱ्या गैरयाचे काम नाही .अभिनय उपजत असावा लागतो किंवा तो येण्यासाठी मेहनत घ्यावी लागते .आपल्याला आपली जवळची व्यक्ती जशी आपली वाटते तसेच एखादा अभिनेता ,अभिनेत्री आपल्याला आपली वाटते जवळची वाटते आणि आवडते. कारण त्यांच्या भोवती एक वलय निर्माण झालेल असत  

कधी आपल्या उदास जीवनात हास्य आणणाऱ्या ह्याच व्यक्ती असतात. मग त्यांना नाव का ठेवायची. जास्त कर tax ह्याच व्यक्ती भरतात म्हणजे अप्रत्यक्षरीत्या कर स्वरूपात ह्याचं योगदान आहेच की. बरेच जण दान धर्म करतात. ह्याचा अर्थ त्यांना माहीत आहे की आपण पण या समाजाच काही देण लागतो.

सीमेवरच्या जवानांना पण ह्या व्यक्ती आवडत असतात. ते ही चित्रपट बघतात, गाणी ऐकतात त्यांनाही एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री आवडत असते. एखादा अभिनेता वाईट असेल पण सगळेच तसे असतील अस नाही शेवटी तोही माणूसच स्वतःच्या चेहऱ्याला रंग फासून दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचे रंग भरणारे हे तारे तितकेच महत्वाचे. 


म्हणूनच दुसर्यांना शहाणपणाचा डोस पाजणाऱ्या अतीशहाण असणाऱ्या ह्या माणसांना शहाणपण देरे देवा असे म्हणावेसे वाटते.


शुभम भवतु।

Blog By 

Pradeep Mohite



Monday, 26 February 2018

आपली माती आपल गाव

आज बोरिवली रत्नागिरी एस टी बघितली. मन थेट गावात जाऊन पोचलं. आताच गाव नाही पूर्वीच गाव मातीच्या भिंती असलेला घर शेणाने सारवलेल.आता तर एस टी चा प्रवास फारसा होत नाही कोकण रेल्वे आहे. लहान असताना जायचो एस टी ने वेगळाच उत्साह असायचा. 


पूर्वी गावी जायचा आनंद काही औरच असायचा. मातीचे रस्ते अहो मातीचे म्हणजे तुमचा तळवा पूर्ण मातीत भरेल एवढी माती. गाव थोडं आत असल्या मुळे पक्का रास्ता न्हवता. तालुक्याला जायला मोजक्याच गाड्या. लांब दूरवर लाल मातीचा धुरळा उडाला की सगळे समजायचे एस टी बस आली.  आता सगळं बदललय रेल्वे मुळे गावचा प्रवास लवकर होतो. डांबरीकरण झालय रस्त्याच आणि माणसांच पण. 


पूर्वी गावातली माणस परतीला मुंबइला निघालो की सोडायला यायची कोण मुके घायचे कोण डोक्यावरून हात फिरवून बोटं कडाकडा वाजवायची. बावा सांभाळून जा र लेकरा. माया ओसंडून व्हायची मनातुन आणि डोळ्यातून. आता तशी माणसंही नाही आता बोट कडाकडा वाजत नाहीत कारण अगोदरच दुसरयानच्या नावाने ती मोडून झालेली असतात. 

गावी पण शहरीकरणाचा प्रभाब वाढला थोडा फार पैसा सगळ्यांच्याच खिशात दिसायला लागलाय. कवडीमोलाच्या जमिनीला चांगला भाव मिळायला लागलाय त्यामुळे माणसांचा पण भाव वाढलाय. 


पूर्वी नळ न्हवते गावात खूप लांबवर नदिवरून पाणी आणावे लागत असे. जर उन्हाळ्याचे दिवस असले तर नदीचे पाणी आटून जायचे मग नदीच्या बाजूलाच एक खड्डा खोदायचा त्याला आम्ही गावच्या भाषेत डूरा म्हणायचो डूरा म्हणजे छोट डबकं त्यातून थोडं थोडं पाणी भरायचं आणि एक उंच पाखाडी म्हणजे छोटी टेकडी चढून पायवाटेने घरी पाणी न्यायचं. आता नळ आलेत. मी पण कधीतरी जायचो पाणी आणायला पण हंडा अर्धा रिकामा व्हायचा कारण मी अर्ध्या पाण्याने भिजून जायचो

जेवद्या सुख सुविधा आल्या तेवढि माणसं दुरावत चालली. असो काळाचा महिमा दुसर काय. 


आता तर गावच्याआंब्याची गोडी पण कमी झाली. गावच्या घरासमोरच्या अंगणात खूप मोठं झाड होत आंब्याचं.  खूप रसाळ आंबा पिकलेला आंबा पडला की सगळे धावत सुटायचे. आंबा इतका गोड की हापूस आंबा पण फिका पडावा. आता हापूस खाताना पण जी मज्जा येत नाही ती त्यावेळी तो आंबा खाताना यायची. आता तर दगडानाही वाईट वाटत असेल आपल्याला कोणी हातातच घेत नाही म्हणून. आता मोबाइल आले त्यामुळे हात बिझी झालेत मोबाईल मष्ये. 

गावच जेवण म्हणजे काय बोलाव गावच पाणी म्हणजे जादूच पाणी त्या पाण्याच्या गोडवा असा की जेवण लाजवाब काहीही बनवा मस्तच होणार. 

कितीही लिहल तरी कमीच आहे गावाबाबत. काळा प्रमाणे खूप सुधारणा झाली गावात. राहणीमान सुधारल. काही घडलय काही बिघडलय हे होणारच . पण गावच सौन्दर्य अजूनही टिकून आहे . ते तितकंच सुंदर आहे कारण निसर्ग बदलला नाही तो तसाच हिरवागार. मनाला उत्साह देणारा तजेला देणारा. म्हणून आजही मनाचा एक कोपरा गावची आठवण झाली की हळवा होतो. खूप सुंदर आठवणी जमा आहेत मनात माझ्या. तुमच्याही असतील. 


तुम्हाला आठवतो का तुमचा गाव थंडगार हवा आणि रानातली ती बाव. गप्पा होत्या मोठ्या आणि आजी आजोबांच्या हातातल्या काठ्या. आंब्याचा तो पार आणि वार थंडगार. गोठ्या मध्ये ढोर आणि जीवाला जीव देणारी पोर.जात्या वरच गाणं होत आणि गाव माझा शहाणं होत. सुन्या झाल्या वाटा आता आणि सुने झाले पार. पुन्हा येतील का परतुन आता सुखाचे क्षण चार सुखाचे क्षण चार..

BLOG BY 

PRADEEP M



Sunday, 25 February 2018

क्षण आनंदाचे

आज एक शाळेतली मैत्रीण फेसबुक वर भेटली. भेटली म्हणण्या पेक्षा मी शोधून काढली. थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारल्या. बऱ्याच वर्षे नंतर भेटली त्या मुळे जुने दिवस आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 

तिच्याशी बोलून झाल आणि मग सोफ्यावर आडवा पडलो आणि परत जुन्या दिवसांची उजळणी चालू झाली . शाळेतले दिवस शाळेतले मित्र. त्या वेळचे दिवस एखाद्या चलतचित्रा सारखे डोळ्यासमोरून पुढे पुढे सरकत होते. 


छान आनंदी जीवन. तेव्हा वाटायचं मोठे कधी होणार आणि आता वाटते का झालो. शाळा सुटली पुढे कॉलेज. कॉलेज चे दिवस. तारुण्य ओसंडून वाहणारे. प्रेमळ मित्र 
 ते बंक लेक्चर. फार छान दिवस होते ते


आता मोबाइल वर मित्र आहेत पण कुठेतरी हरवलेले. ते तर हरवलेत आणि मी सुद्धा आपण सगळे. आईचा रुमाल हरवला तो मला सापडला. तो त्यावेळी सापडायचा आता लवकर सापडतच नाही. पतंग उडायचे पूर्वी फार आता आमचाच पतंग झालाय उडतोय पण भरकटत चाललाय. 


खरच आपण आनंदी आहोत का फेसबुक वर टाकलेल्या आनंदी क्षणांच्या फोटोज वरून आम्ही खूप आनंदी आहोत असा आभास आपण निर्माण करतोय त्या क्षणाला आपण आनंदी आहोत पण रोजच काय. आपल्याला रोज आनंदी राहायचंय पण वेळ नाही नोकरी, धंदा यातून वेळ मिळत नाही कामाच प्रेशर आणि बरिच टेन्शन. मित्रानो तुम्ही म्हणाल आनंद आता कसा काय मिळवायचा ते तुम्हीच तुमच्या अंतर्मनाला विचारा. दान धर्म करा. एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न द्या. कधीतरी आपण एखाद्या वृद्ध माणसाला किंवा एखाद्या अंध व्यक्तीला रास्ता ओलांडून देतो तेव्हा पण आपल्या मनाला आनंद मिळतो .छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. कामावरून घरी आलात की आपल्या मुलांना ,बायकोला मिठी मारा .रोज थोडा वेळ आपल्या मुलांसाठी काढा . मोबाइलला थोडा वेळ बाजूला ठेवा. 


आपल्या माणसा सोबतचा आनंद आपल्या हृदयात अपलोड करत जा. आपला स्टेटस अपडेत करत जा. कंमेंटस द्या आपल्या प्रियजनांना. 


मित्रांना भेटा गप्पा मारा . थोडा वेळ परमेश्वरा साठी द्या त्याचे रोज आभार माना . 


 जीवन आनंदात घालवा. स्वतःला आनंद दया आणि दुसऱ्यालाही

शुभम भवतु

Blog By

PRADDEP M